🍁 ८ आॕगष्ट रोजी होणारे राज्यभर धरणे आंदोलन कशासाठी ? 🍁
शिक्षक बंधू - भगिनींना,
सप्रेम नमस्कार
गोर-गरीब, शोषित-वंचित, कामगार-कष्टकरी, शेतकरी- शेतमजूर अशा परिवारातील बालकांच्या दर्जेदार शिक्षणाची परवड जाणीवपूर्वक केली जात असल्याचे जाणवत आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील जातीभेद व लिंगभेदाची दरी संपुष्टात येत आहे . मात्र आर्थिक विषमतेची दरी रुंदावत आहे . गोरगरीब वर्गातील मुले ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिकतात त्या व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारार्थी होईल अशाच पद्धतीची धोरणे इथे राबविली जात आहेत. परिणामी सामान्य गरीब खेडूत वर्गाची मानसिकता शिक्षणाच्या बाबतीत उदासिन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा शिक्षण ही मूठभर वर्गाची मक्तेदारी होऊ शकते.
महाराष्ट्रातील शिक्षक बांधव विशेषतः ग्रामीण भागातील सामान्य कुटूंबातून पुढे आलेला असून आज पांढरपेशी मध्यमवर्गीय म्हणून वावरतो आहे . २५/३० वर्षापूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि तुटपुंज्या सोयीसुविधा उपलब्ध असताना आजच्या शिक्षकांना विद्यार्थी दशेत चांगले दर्जेदार व गूणवत्तापूर्ण शिक्षण मिळत होते* याची पदोपदी जाणीव होत आहे . मात्र आज स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आपण विद्यार्थ्यांना तसे शिक्षण देण्यात कमी पडत आहोत याची जाणिव संपूर्ण राज्यातील शिक्षक बांधवांना अस्वस्थ करीत आहे. पूर्वी शिक्षकांना शिकविणे हे एकमेव एक काम होते..... आज शिकविण्याऐवजी अन्य कामांचा बोझा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे . शिक्षण क्षेत्राला प्रयोगशाळा समजून गेली २५ वर्षे वारंवार नानाविध प्रयोग केले जात आहे . पहिल्या धोरणाच्या फलनिष्पत्तीचा सारांश शोधण्यापूर्वीच दुसरे प्रयोग इथे सातत्याने केले जात आहेत .
शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या नावाखाली विविध उपक्रम (प्रत्येक उपक्रमाच्या साठी प्रपत्रे आणि नमुन्यांची संख्या व खानापुर्तीची सक्ती बघता या उपक्रमांना उपद्रव म्हणजेच अधिक संयुक्तिक राहील.) विविध योजनांची दररोज मागितली जाणारी माहिती, कोणतेही गांभीर्य नसलेले आणि शून्य परिणामकारकता असलेले ऑनलाइन-ऑफलाइन प्रशिक्षणे कार्यशाळा, परिषदा, आपापल्या कल्पनेतून वेगवेगळे App Install करण्यासाठी यंत्रणांचा असलेला अनाकलनीय पुढाकार* यामुळे दैनंदिन अध्यापन प्रभावित होत आहे.
परंतु या सर्व बाबींचा साकल्याने विचार न करता गुणवत्ता ऱ्हासाचे खापर शिक्षकांवर फोडण्यासाठी यंत्रणा कोणताही कसर सोडत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये *शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. शाळा सुरू होऊन प्रदीर्घ कालावधी झाला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके मिळाल्याची स्थिती नाही, भेदभाव पूर्ण गणवेश योजना अजूनही सुरु आहे; त्यातही यावर्षी अपुऱ्या अनुदानामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे लाभार्थी ठरलेल्यांना सुद्धा गणवेश मिळाले नाहीत.शाळांच्या मुलभूत अशा भौतिक सुविधेसाठी सादिल आणि समग्र शिक्षा अभियान मधून आवश्यक अनुदान मिळत नाही.
मग या प्रतिकूल परिस्थितीत गुणवत्तेच्या ऱ्हासाला मुख्याध्यापक-शिक्षक जबाबदार कसे..?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या शिक्षकांच्या भूमिकेशी सुसंगत अशी चळवळ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सुरू केली आहे.
शिक्षकांना शिकवू द्या... लेकरांना शिकू द्या..!
या मागणीसह- शिक्षकांच्याही अनेक मागण्या शासन- प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्या केवळ आर्थिकच नाही तर सेवाविषयक संबंधाने अत्यंत महत्त्वाच्या आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सोमवारी, दि. ८ ऑगस्ट २०२२ "धरणे-निदर्शने सत्याग्रह" आयोजित केला आहे.
शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील संघटना-कार्यकर्ते अशा सर्वांना विनंती-वजा आवाहन करण्यात येते की, या सत्याग्रहात सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त करावा !!
🌀 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग 🌀
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा