सोमवार, २१ एप्रिल, २०२५

कणकवली पंचायत समिती येथे शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीची सदिच्छा भेट

     कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन तालुका कार्यकारिणीने आज सोमवार दिनांक २१  एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठिक ४ वाजता कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. अरुणजी चव्हाणसाहेब आणि गटशिक्षणाधिकारी मा. किशोरजी गवससाहेब यांची त्यांच्या कार्यालयात नियोजित सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान तालुका तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    माजी तालुका सरचिटणीस मा. संतोष कांबळे यांनी भेटीचा उद्देश स्पष्ट केला. नूतन तालुकाध्यक्ष मा. सुशांत मर्गज, तालुका सरचिटणीस मा. निलेश ठाकूर, महिला अध्यक्षा मा. दर्शना हुंबे, महिला सचिव मा. सारिका पवार आणि शिक्षकनेते मा. टोनी म्हापसेकर यांच्यासह सर्व तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.

    यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्याकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी या दोघांनीही सन २०२५ ते सन २०२८ या कालावधीसाठी निवड झालेल्या नूतन तालुका कार्यकारिणीचे (महिला आघाडीसह) अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर योग्य अंमलबजावणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

    भेटीदरम्यान विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यात शैक्षणिक योजनांच्या आकर्षक रील्स तयार करणे, शाळांना प्लास्टिकमुक्त करणे, तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त शाळांची अंमलबजावणी आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांवर विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यात आले. तालुकाध्यक्ष मा. सुशांत मर्गज यांनी संघटनेची आगामी धोरणे आणि वाटचाल स्पष्ट केली. तालुका सरचिटणीस मा. निलेश ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.

    या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी शिक्षकनेते टोनी म्हापसेकर, जिल्हा महिला अध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनायक जाधव, संतोष कुडाळकर, माजी तालुका महिला अध्यक्षा नेहा मोरे,  तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर, महिला तालुका अध्यक्षा दर्शना हुंबे, महिला सचिव सारिका पवार, शिक्षक बँकेचे संचालक श्रीकृष्ण कांबळी, तालुका कार्याध्यक्ष संतोष कांबळे, संदिप गोसावी, धीरज हुंबे, ईश्वरलाल कदम, सुनिल गावकर, प्रवीण कदम, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ घाडीगावकर, तालुका कार्यालयीन चिटणीस संतोष राणे, तालुका संपर्क प्रमुख दिनेश जंगले, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कुबल, तळेरे विभागीय अध्यक्ष अजय सावंत, तालुका अंतर्गत हिशेब तपासनीस नंदकुमार सरंगले, तालुका सल्लागार शिवाजी मडव, महिला कार्याध्यक्षा कविता बुचडे, तालुका कोषाध्यक्षा आरती कांबळी, तालुका कार्यालयीन चिटणीस सविता आर्लेकर, तालुका प्रवक्त्या मयुरी राणे, तालुका संपर्क प्रमुख रश्मी आंगणे, फोंडा प्रभाग उपाध्यक्षा स्नेहल गोसावी, कनेडी प्रभाग उपाध्यक्षा अनुजा कदम, तळेरे प्रभाग उपाध्यक्षा श्रिया गोसावी यांच्यासह अनेक तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

    याव्यतिरिक्त समितीचे शिलेदार आणि समितीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर आणि नारकर यांनीही या भेटीमध्ये आपली उपस्थिती दर्शविली.



























शनिवार, १९ एप्रिल, २०२५

कलेसाठी समर्पित दांपत्य: मा. निलेश ठाकूर सर आणि मा. निकिता ठाकूर मॅडम

    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या शिक्षक कलाकारांनी दशावतारी नाटकाचा बेत आखला आणि या नाट्यप्रवासाला मूर्त रूप देण्यासाठी गरज होती एका हक्काच्या ठिकाणाची, जिथे कलाकारांना रोज तालमी करता येतील. एरव्ही, यासाठी एखाद्या शाळेची जागा मागावी लागली असती, शाळेची चावी आणि सामानाची जबाबदारी घ्यावी लागली असती, जी व्यवस्थापनाच्या दृष्टीने निश्चितच एक मोठी आणि त्रासदायक बाब ठरली असती.

    पण म्हणतात ना, जिथे इच्छाशक्ती असते, तिथे मार्गही मिळतो! या नाट्यवेड्या शिक्षकांच्या मदतीला धावून आले मा. निलेश ठाकूर सर आणि त्यांच्या पत्नी मा. निकिता ठाकूर मॅडम. या कलाप्रेमी दांपत्याने आशिये गावातील त्यांच्या सुंदर अशा ‘ठाकूर वाडी’त या नाटकाच्या तालमींसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचे हे औदार्य केवळ जागा देण्यापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी या कलाकारांसाठी अल्पोपहार आणि नाश्त्याची सोय देखील केली.

    ठाकूर सरांनी आपल्या वाडीतील जागा जणू काही ‘कलेचं मंदिर’ बनवून टाकली. या मंदिराच्या प्रांगणात दशावतारी नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि प्रत्येक कलाकाराला हक्काचं व्यासपीठ मिळालं. कोणतीही अडचण नाही, कोणतीही व्यवस्थापकीय कटकट नाही, फक्त कलेच्या साधनेत तल्लीन होण्याची संधी मिळाली.

    खरंच, मा. निलेश ठाकूर सर आणि मा. निकिता ठाकूर मॅडम यांनी जे सहकार्य या शिक्षक कलाकारांना दिलं आहे, ते अनमोल आहे. त्यांच्या या मदतीमुळेच दशावतारी नाटकाच्या तालमी सुरळीतपणे सुरू राहिल्या आणि एक उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. 

    या कलाकारांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने या समर्पित दांपत्याचे मनःपूर्वक आभार! त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. कलेसाठी आणि कलाकारांसाठी त्यांनी दाखवलेली ही उदारता नेहमीच प्रेरणादायी राहील. 

शब्दांकन : प्रवीण अशितोष कुबल 

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

🔴 कणकवलीत शिक्षक कलाकारांचा बहुरंगी आविष्कार! 'यक्ष उद्धार'सह विविध कला प्रकारांची रसिकांना मेजवानी!

कणकवली, दि. १८: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कणकवली यांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात केवळ 'यक्ष उद्धार' या दशावतारी नाटकानेच नव्हे, तर विविध कला प्रकारांनी रसिकांची मने जिंकली. शिक्षक कलाकारांनी नाट्य, गायन आणि एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून एक बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

'यक्ष उद्धार' या नाटकामध्ये संतोष तांबे यांनी यक्षाची प्रभावी भूमिका साकारली, तर सदाशिव राणे यांनी पार्वतीची भूमिका अत्यंत समर्थपणे वटवली. सुरुवातीला बासरीवादन करुन त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मंगेश राणे यांचा ब्रम्हराक्षस आणि निलेश ठाकूर यांचा सोमा गुराखी यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. राजा सूर्यसूताच्या भूमिकेतील राजेंद्र गोसावी आणि वीरभद्राच्या भूमिकेतील अजय तांबे यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या. सुमतीच्या भूमिकेतील राज कदम आणि चित्रसेन गंधर्वाच्या भूमिकेतील राजाराम भिसे यांच्या अभिनयानेही रंगत आणली. या नाटकात संतोष कुडाळकर यांनी नारदाची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली.

नाटकाच्या संगीताची बाजू सुनिल गावकर (हार्मोनियम), सोहम मेस्त्री (मृदुंग) इयत्ता: दहावी,  आणि समर्थ सूतार (झांज) इयत्ता : सातवी यांनी उत्तमरीत्या सांभाळली. तर, कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात शिक्षक दाम्पत्य दिनेश जंगले आणि ऋतुजा जंगले यांनी गणपती (रिध्दी-सिद्धी) साकारून केली. या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शन शिक्षक असलेले मा. संतोष तांबे सर यांनी केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात गायन आणि एकपात्री अभिनयाचीही विशेष रंगत भरली होती. रश्मी आंगणे यांनी 'आई' या विषयावर एक मार्मिक एकपात्री प्रयोग सादर केला, ज्यामुळे सभागृहातील सर्व प्रेक्षक भावुक झाले होते. त्यांनी 'गजानना श्री गणराया' या गाण्याचे सुमधुर गायन करून वातावरण भक्तिमय केले. स्नेहल गोसावी यांनी भालचंद्र महाराजांचे गीत म्हटले, तर इरफान सारंग सरांनी आपल्या हिंदी गीतांच्या गायनाने कार्यक्रमाची लज्जत वाढवली. असरोंडकर मॅडम यांनी गायिलेले 'नाविका रे' हे गाणं अप्रतिम झाले. अजय तांबे सरांनी 'प्रथम नमो गौतमा' हे भीमगीत जसेच्या तसे गाण्याचा उत्तम प्रयत्न केला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. स्वराशा कासले यांनी 'मोगरा फुलला' हे लोकप्रिय गाणे सुंदरपणे सादर केले, तर संजय तांबे यांनी 'दिल है के मानता नही' हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दिव्या गोसावी हिने 'आता गं बया' हे गाणं उत्तमरीत्या सादर केले आणि संतोष पाटील यांनी 'सोचेंगे तुम्हे प्यार' हे गाणे गाऊन कार्यक्रमात प्रेमळ रंग भरला.

एकंदरीत, कणकवलीतील शिक्षक कलाकारांनी 'यक्ष उद्धार' सह विविध कला प्रकारांचे प्रभावी प्रदर्शन केले आणि रसिकांच्या मनात एक अविस्मरणीय छाप सोडली. शिक्षक केवळ अध्यापनातच नव्हे, तर कला क्षेत्रातही उत्कृष्ट आहेत, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. या सर्व कलाकारांचे आणि दिग्दर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन!




































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...